मंदिरे किंवा कोणतीही धार्मिक स्थळे उघडण्याबाबत मला काय वाटते?

मंदिरे किंवा कोणतीही धार्मिक स्थळे उघडण्याबाबत मला काय वाटते?

सध्या आपण संपूर्ण जगामध्ये कोरोना महामारीशी लढतो आहे. याच बरोबर आपल्याला आपल्या ज्या मूलभूत गरजा आहेत जसे की अन्न, वस्त्र, निवारा यादेखील या कठीण परिस्थितीमध्ये सहजरित्या मिळणे अवघड होऊन बसले आहे. याच मूलभूत गरजा पुढे उत्तम आरोग्य आणि उत्तम शिक्षण असे वाढलेले दिसते. मी सामान्य घरातील नागरिकांच्या विषयीच बोलतो आहे फक्त. याच सामान्य लोकांच्या नोकऱ्या देखील सध्या शाबूत नाहीत. किंवा भविष्यात त्या शाबूत राहतील याची देखील कोणतीही हमी नाही. या परिस्थितीमध्ये निदान घरातील आर्थिक भार व्यवस्थित होण्याच्या दृष्टीने आपल्या महाराष्ट्रात लॉकडाऊन टप्या टप्याने खोलण्यात आले. काही कामकरी वर्गाला प्रथम प्राध्यान्य देऊन आज बहुतांशी कामगार वर्ग रोज घराच्या बाहेर पडत आहे.

हा बाहेर कामाला पडणारा कामगार वर्ग आज बाहेर सुरक्षित आहे का? अजिबात नाही; तरीही तो कामासाठी घरातल्या दोन वेळच्या जेवणाची सोय करता यावी म्हणून तो घराच्या बाहेर पडतोय. काही वर्गाला घरीच बसुन राहावे लागत आहे, घरी लहान मुले अडकुन राहिली आहेत त्यांच्यावर लक्ष द्यायचे आहे, कोरोना होऊन गेला म्हणून तातडीने कामावर जाता येत नाहीये, ही सध्याची परिस्थिती आहे. सामान्य माणूस हा सध्या या सर्व गोष्टींसाठी लढतो आहे.




काय वाटते, देव देवळात किंवा धार्मिक स्थळी आहे, कसं शक्य आहे तो या सर्वांना ही लढाई जिंकण्यासाठी बाहेर प्रेरित करतो आहे. नरसिंहाच्या कथेनुसार जर देव चराचरात आहे तर मग फक्त मंदिरच का? सध्या शाळा महाविद्यालये ऑनलाईन सुरू आहेत. झूम मिटिंग किंवा गूगल मीट यांसारख्या माध्यमातून मुले शिक्षण घेत आहेत घरी बसून मग त्या ठिकाणी सरस्वती देवी किंवा गणेश भगवान आहेतच ना. शेतामध्ये यावर्षी बळीराजा अधिक पाऊस पडल्याने प्रसन्न होतोय. कष्ट केलेल्या आई बापाने आणलेल्या भाजीचा सुगंध स्वयंपाक घरात येतोय तेथे आहे ना अन्नपूर्णा. या धावपळीच्या जीवनात अधिक असाच व्यायाम होतोय म्हणजे हनुमान देखील आपल्याला प्रसन्न होतोय. कोणी भेटले तर त्यासाठी मुखात राम राम देखील येत आहेत. मग ही सर्व देव मंडळी बाहेर आहेत आपल्यासोबत आहेत तर कशाला लगेच आपल्याला पाहिजेत मंदिर उघडण्याची घाई.

आता थोडे वैज्ञानिक कारण बघुयात. कोरोना होण्याची जी दाट शक्यता वर्तवली जाते आहे ती आहे जेष्ठ मंडळींना ज्यामध्ये वयस्कर मंडळी आहेत ज्यांना काही व्याधी जसे की मधुमेह, कर्करोग, फुफ्फुसा संदर्भात काही आजार आहेत. ही सर्व मंडळी आपली निस्सीम श्रध्दा असल्याने हमखास मंदिरात येतील. किंवा आपापल्या धार्मिक स्थळी येणार. याठिकाणी आपला भारतीय समाज हा आपल्या धर्माप्रति किती एकनिष्ठ असतो हे सर्वांनाच माहिती आहे मग तो हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, शीख, जैन किंवा अन्य कोणत्याही धर्माचा असो. किंवा एखादा व्यक्ती, "इतके दिवस आमच्यावर जी कृपादृष्टी ठेवली आहे तशीच ठेव रे परमेश्वरा", हे बोलायला जाऊ शकतो तसाच एखादा व्यक्ती, " माझ्यावर हे कोरोनाचे संकट आले आहे तूच मुक्त कर रे परमेश्वरा यातून" तेंव्हा जर मंदिरे किंवा धार्मिक स्थळे उघडली तर हेच दोन व्यक्ती एकमेकांना भेटले तर कोरोना न होण्याबद्दल कोणी  गॅरंटी घेऊ शकते का? शिवाय प्रत्येकाच्या मनात नसेल तरी घरात आपले श्रद्धास्थान आपल्या देवाचा देवारा- देवघर असतेच ना? मग कशाला घ्यायची आहे सध्या आपल्याला विषाची परीक्षा. कोरोनावर अद्याप लस निघाली नाही. झालाच कोणाला तर सरकारी दवाखान्यात बेड शिल्लक नाही च्या बातम्या तर खाजगी मध्ये भरघोस रक्कम आकारली जाते आहे या गोष्टी बोलल्या जात आहेत.

माझं वैयक्तिक मत आहे की घरातील आई - वडील ही देवस्थाने आपल्यासाठी कोणत्याही कालावधीत मग कोरोना असो किंवा नसो खुली आहेत. नैवैद्य दाखवायचा आहे त्यांना दाखवा, आशीर्वाद घ्यायचा आहे त्यांचा घ्या, पूजा करायची आहे त्यांचीच करा, नतमस्तक व्हायचे आहे त्यांच्यापुढे व्हा. हा थोडा कोरोना कालावधी आपण काळजी घेतली की त्याच आई वडिलांना घेऊन धार्मिक स्थळी जाऊयात पण सध्या जीव धोक्यात घालणे चुकीचे.

हा कोरोना कशाची पर्वा नाही करत. हा श्रीमंत - गरीब किंवा अमुक तमुक जातीचा असा भेदभाव नाही करत. आपल्या महाराष्ट्रात कौन बनेगा करोडपती च्या माध्यमातून करोडो पैसे वाटणारे अमिताभ बच्चन हे देखील कोरोनाच्या विळख्यातून परतले. भारताचे गृहमंत्री श्री अमित शाह हे देखील कोरोनवर मात करून परतले. मात्र सुप्रसिद्ध गायक एस. पी. बालसुब्रह्मण्यम सध्या आपल्यासोबत नाहीत. आशालता वाफगावकर या प्रसिद्ध अभिनेत्री तर खुद्द आई माझी काळूबाई या सिरिअलच्या सेटवरच कोरोनामुळे विळख्यात मृत्युमुखी पावल्या. मग सध्या आपल्या जेष्ठांची पर्वा आपण करूयात मंदिरे आपल्या घरातच पाहुयात.  

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. उद्धव ठाकरे हळुवारपणे विचार करून एक एक पाऊल उचलत आहेत. मंदिरे देखील पूर्वी सारखी उघडतील पण थोडी आस्था आणि थोडा संयम बाळगू. राज्य धीराने जोपासणाऱ्या मुख्यमंत्री महोदयांवर विश्वास दाखवू, त्यांना पाठिंबा देऊ. 

प्रा. अलोक अर्जुन पवार, 

एम. एस्सी संगणक शास्त्र, एमबीए, एम.एस्सी संप्रेषण भौतिक शास्त्र, एम. फील.

प्राचार्य, स्वराज कॉलेज ऑफ कॉमर्स अँड कॉम्प्युटर स्टडीज, धनकवडी, पुणे ४११०४३

Comments

  1. माणसात देव बघण्याचा दृष्टिकोन वाढीस लागण्यास मदत होईल सदर लेखाची. तसेच मंदिरांवर उपजीविका चालणाऱ्या कष्टकरी लोकांचा (अर्थात हे लोक मंदिरा बाहेरच अधिक असतात उदा. विक्रेते) त्यांचा लॉकडाऊन व उपजीविका संदर्भात वेगळा विचार करण्याची गरज आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. स्वप्नाली आपण मंदिरे बंद ठेवत आहोत. आता असा प्रश्न आहे जे विक्रेते मंदिरा बाहेर किंवा एखाद्या दर्ग्याबाहेर काही गोष्टींची विक्री करतात त्यांची तर हार - फुले आपण घरातील देवांना घालतोच की, ती थोडी बंद झाली आहेत. शिवाय आपण आता गणपती साजरे केले, आता दसरा साजरा करणार आहे. यानिमित्ताने फुले पण आपल्या घरी आलीच ना. आणि थोडेच दिवस करायचे आहे हे सर्व . राज्य सरकारची संशोधन टीम जर काही शोध लावून काही करू शकली तर हे लवकरच सुरू होईल. आणि तेवढाच या कष्टकरी वर्गाला नवीन काही कमाईसाठी पर्याय आहे का असा विचार करण्यास पण वेळ भेटेल

      Delete
  2. माणसात देव बघण्याचा दृष्टिकोन वाढीस लागण्यास मदत होईल सदर लेखाची. तसेच मंदिरांवर उपजीविका चालणाऱ्या कष्टकरी लोकांचा (अर्थात हे लोक मंदिरा बाहेरच अधिक असतात उदा. विक्रेते) त्यांचा लॉकडाऊन व उपजीविका संदर्भात वेगळा विचार करण्याची गरज आहे.

    ReplyDelete
  3. माणसात देव आहे मग मंदिरासाठी अट्टहास का? राजकारणी मंडळींनी राजकारण करताना तारतम्य बाळगावे असे वाटते. या लोकांनी आपण किती वेळा देवळात जातो याचा तपशील जाहीर करावा.माझेमते देव म्हणजे माणसाला चांगुलपणा तो जागृत करण्याचा व त्याच्या मनाचे मंदिर उघडण्याचा प्रयत्न केला तर खरं समाजकार्य केले असे होईल.

    ReplyDelete
    Replies
    1. नाही मी अगदी मंदिरे नकोच असे म्हणत नाहीये, मंदिरे, दर्गा, चर्च, बौद्धविहार, किंवा अन्य धार्मिक स्थळे ही भावनांचा विषय आहे. पण वेळोवेळी आपण घराला देखील मंदिर करू शकतो, हा मुद्दा मी मांडण्याचा प्रयत्न केला. आणि कोरोना काळात राजकारणी लोकांपेक्षा आपणच अशा धार्मिक स्थळी जाणे टाळले पाहिजे.

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

अंतर नक्की कुठले सामाजिक की शारीरिक